बहिणभावांच्या प्रेमसंवर्धनाचा दिवस , भाऊबीज.
भाऊबीज
कार्तिक शुद्ध द्वितीयेला ।
सण आहे भाऊबीजेचा ।।
बंधू भगिनींचा प्रेमसंवर्धनाचा दिवस ।
योग बहिणीच्या घरी भोजनाचा ।।
दिवाळीचा पाचवा दिवस म्हणजे भाऊबीज, कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज हा सण साजरा केला जातो.
या दिवशी यमराजाची बहीण यमुना हिने आपल्या भावाला म्हणजेच यमराजाला अगत्यपूर्वक जेवायला बोलावले होते. यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेला अशी पौराणिक कथा आहे।.
हा दिवस म्हणजे शरद ऋतूतील कार्तिक मासातील द्वितीया. द्वितीयेचा चंद्र आकर्षक व वर्धमानता दाखवणारा आहे. तेव्हा ‘बीजेच्या कोरीप्रमाणे बंधुप्रेमाचे वर्धन होत राहो’, ही त्यामागची भूमिका आहे. आपल्या मनातील द्वेष व असूया निघाल्यामुळे सर्वत्र बंधुभावनेची कल्पना जागृत होते; म्हणून त्याकरिता भाऊबीजेच्या सण साजरा केला जातो.
बंधू-भगिनींचा प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे. ज्या समाजात भगिनींना समाजातील व राष्ट्रातील पुरुष वर्ग भगिनी समजून त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांना अभय देतील व त्यामुळे त्या समाजात निर्भयतेने फिरू शकतील, तो दिवस, म्हणजे दीपावलीतील भाऊबीज पूजनाचा दिवस.
या दिवशी बहिणीच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाऊ मग ओवाळणीच्या ताटात ‘ओवाळणी’ देऊन बहिणीचा सत्कार करतो.
जर काही कारणाने बहिणीला कोणी भाऊ भेटलाच नाही तर ती चंद्राला भाऊ समजून ओवाळते. भावा-बहिणीने एकमेकांची आठवण ठेवावी, विचारपूस करावी, एकमेकांवर प्रेम करावे यासाठी हा सण साजरा करतात.
"आली आली दिवाळी।
बहीण - भावा ओवाळी।।"......
राधिका देशपांडे.
Comments
Post a Comment